पावसाळा आता आला! पाऊस आणि कविता हे कधी वेगळे न होणारे, कधी न बिघडणारे समीकरण आहे. ही अशाच काही आठवणीतल्या कवितांची उजळणी !
शांताबाई आणि पावसाची कविता काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे नां? ही त्यांची बरीच जुनी कविता आहे.
पावसाच्या धारा, येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये, तुडुंबले जळ
झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली, गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया, बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे, डोकावून खार
झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे, शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे, जणू नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें, रंगदार छबी
थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें, पक्षीजात खुले
धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने, मनी संतोषली..!
- शांता शेळके
No comments:
Post a Comment